Tharala Tar Mag Serial : स्टार प्रवाहवर तीन तासांचा महासंगीत सोहळा; ३३ कलाकारांची फौज!

Tharala Tar Mag Serial : स्टार प्रवाह वाहिनी आपल्या प्रेक्षकांसाठी नेहमीच काहीतरी नवीन आणि खास घेऊन येत असते. याच ধারাবাহিকतेत, ९ फेब्रुवारीला एक अनोखा प्रयोग प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. ‘ठरलं तर मग’ आणि ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या दोन लोकप्रिय मालिकांचा महासंगीत सोहळा तब्बल तीन तास प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

या महासंगीत सोहळ्यात ३३ कलाकारांची फौज असणार आहे. अर्जुन, सायली, नंदिनी, पार्थ, जीवा आणि काव्यासह दोन्ही मालिकांतील सर्व प्रमुख कलाकार या सोहळ्यात आपल्या अदाकारीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतील. तीन तासांचा हा भव्य सोहळा साकारण्यासाठी १५० हून अधिक तज्ञ मंडळींनी तीन दिवस अथक मेहनत घेतली आहे.

या महासंगीत सोहळ्याचे शूटिंग वेळेत पूर्ण व्हावे यासाठी दोन हुबेहुब सेटची निर्मिती करण्यात आली होती. कला दिग्दर्शक तृप्ती ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे दोन्ही सेट उभारण्यात आले. ‘ठरलं तर मग’ मालिकेचे दिग्दर्शक सचिन गोखले यांनीच हा तीन तासांचा महासंगीत सोहळा शूट केला आहे.

याविषयी बोलताना सचिन गोखले म्हणाले, “माझ्यासाठी हे खरंच खूप मोठं आव्हान होतं. स्टार प्रवाहने माझ्यावर विश्वास दाखवला, त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. ‘ठरलं तर मग’च्या कलाकारांसोबत मी पहिल्या दिवसापासून शूट करत आहे, मात्र ‘लग्नानंतर होईलच प्रेम’च्या कलाकारांसोबत या महासंगीतच्या निमित्ताने पहिल्यांदा काम केले. प्रत्येक पात्राला समजून घेऊन शूटिंग करत होतो. तीन तासांचा एपिसोड जवळपास तीन दिवस शूट करत होतो. हा अनुभव नक्कीच अविस्मरणीय आहे.”

तीन तासांचा हा महासंगीत सोहळा उभा करणे सोपे नव्हते. या आव्हानाविषयी बोलताना स्टार प्रवाहचे बिझनेस हेड सतीश राजवाडे म्हणाले, “दोन मालिका, ज्यांची स्वतंत्र कथानके सुरू आहेत, त्या एकत्र गुंफून त्याची एक गोष्ट बांधणं आणि त्यात तीन तासांचा भक्कम भाग बनवणं आणि ३३ कलाकार असणं हे खरंच खूप मोठं आव्हान होतं. स्टार प्रवाहच्या संपूर्ण टीमने मिळून हे आव्हान यशस्वीपणे पार पाडले आहे. रसिकांना मनोरंजनाची मेजवानी मिळेल यात काही शंका नाही. जितकी मेहनत करतो, तेवढा रसिकांचा प्रतिसाद मिळतो. त्यामुळे असे नवनवे प्रयोग करताना खूप आनंद होतो. मला खात्री आहे की हा महासंगीत विशेष भाग उत्तम मनोरंजन करेल.”

सलग तीन दिवस या महासंगीत सोहळ्याचे शूटिंग सुरू होते. सेटवर सर्व गोष्टी सुरळीत पार पडाव्यात यासाठी निर्माते सोहम आणि सुचित्रा आदेश बांदेकर आवर्जून उपस्थित होते. मालिकेचं कथानक हे मालिकेचा आत्मा असतं. त्यामुळे लेखकाच्या खांद्यावर विशेष जबाबदारी असते. त्यात दोन्ही मालिकांच्या कथेला योग्य न्याय देत कथा बांधणं ही अत्यंत जबाबदारीची गोष्ट आहे. लेखिका शिल्पा नवलकर आणि अश्विनी अंगाळ यांनी या महासंगीत सोहळ्याची कथा अतिशय सुंदर पद्धतीने गुंफली आहे.

या महासंगीत सोहळ्यात ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील मुक्ता-सागर, ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेतील तेजस आणि ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील जयदीप-गौरी यांच्यासह अनेक कलाकार खास परफॉर्मन्स सादर करणार आहेत. तेव्हा ९ फेब्रुवारीला सायंकाळी ७ वाजल्यापासून ‘ठरलं तर मग’ आणि ‘लग्नानंतर होईल प्रेम’ मालिकेचा महासंगीत सोहळा फक्त स्टार प्रवाहवर नक्की पहा!

Leave a Comment