Maharashtra Kesari 2025:’शिवीगाळ झाली म्हणून लाथ मारली’; शिवराज राक्षेचा खुलासा, पंचांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह

Maharashtra Kesari 2025:महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पंचांना लाथ मारल्याच्या आरोपावरून तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आलेल्या शिवराज राक्षेने या घटनेवर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. राक्षेने लाथ मारण्याचं कारण स्पष्ट करताना पंचांच्या निर्णयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्याच्या या खुलासामुळे कुस्तीच्या नियमांविषयी आणि पंचांच्या भूमिकेविषयी नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

राक्षेने आपल्या प्रतिक्रियेत म्हटलं, “मी काही आज कुस्ती खेळायला सुरुवात केली नाही. 15 वर्षांपासून माझं लाल मातीशी नातं आहे. कुस्तीने मला खूप काही दिलं आहे. जर मल्लाचे दोन्ही खांदे टेकले नाहीत आणि पंचच निकाल देतात की कुस्ती झाली, हे कसं? आम्ही अपील करतो, पण तेही फेटाळलं जातं. पंचांसोबत वाद घालण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. मला खालून शिवीगाळ झाली, त्यामुळे मी टोकाचं पाऊल उचललं.”

राक्षेने पंचांच्या निर्णयावरही गंभीर आरोप केले. तो म्हणाला, “कुस्तीत हार-जीत होत असते, यात काही वाद नाही. पण जेव्हा दोन्ही खांदे टेकतात आणि 10 सेकंद होल्ड करायचा नियम आहे. माझ्या बाबतीत एक खांदा टेकला होता, दुसरा नाही. पंचांनी त्यांची चूक मान्य केली. गंगावेस तालमीच्या वस्तादांनीही आमच्यावर अन्याय झाल्याचं सांगितलं आहे. हा अन्याय किती दिवस सहन करायचा? प्रत्येक पैलवानासोबत असंच घडत असेल, पंचांचा निर्णय चुकत असेल, तर खेळाडूचं मोठं नुकसान होतं. त्याची वर्षभराची मेहनत वाया जाते. पैलवान हा गरीब घरातील असतो. त्याच्या मेहनतीचा आणि खर्चाचा विचार पंचांनी करायला हवा.”

राक्षेने पुढे बोलताना म्हटलं, “माझं खूप मोठं नुकसान झालं आहे. पंचांनी चूक मान्य केली, तर त्यांच्यावरही कारवाई व्हायला हवी. मी रिव्ह्यू मागितला, तेव्हा मला खालून शिवीगाळ झाली, त्यामुळे मी टोकाचा निर्णय घेतला. निलंबनानंतर मी कोर्टात जाणार आहे. महेंद्र गायकवाडवर अन्याय झाला, म्हणून त्याने मैदान सोडलं. गरीब घरातील पैलवानावर अन्याय झाला, तर कोणी आवाज उठवत नाही. पंच सहज बोलून जातात, चूक झाली, पण नुकसान खेळाडूचं होतं. पैलवानावर कारवाई होते, तर पंचांवरही कारवाई व्हायला हवी, म्हणजे पंच निर्णय घेताना दहा वेळा विचार करतील.”

या घटनेमुळे केवळ राक्षे आणि गायकवाड यांच्या कारकिर्दीवरच परिणाम झाला नाही, तर कुस्तीच्या नियमांविषयी आणि पंचांच्या भूमिकेविषयी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या घटनेनंतर कुस्ती क्षेत्रात सुधारणा करण्याची मागणी जोर धरत आहे. विशेषतः पंचांच्या प्रशिक्षणावर आणि त्यांच्या निर्णयावर अधिक नियंत्रण ठेवण्याची गरज आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणी न्यायालय काय निर्णय देतं, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Leave a Comment