Air Taxi: 2026 पर्यंत ‘Air Taxi’ची चाचणी; केंद्रीय मंत्री नायडू यांची माहिती

Air Taxi पुणे: दिल्ली, मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. यावर उपाय म्हणून लवकरच स्वदेशी बनावटीची ‘एअर टॅक्सी’ सुरू करण्यात येणार आहे. 2026 पर्यंत या सुविधेची चाचणी घेण्यात येईल, असे केंद्रीय नागरी हवाई मंत्री किंजीरापू राममोहन नायडू यांनी सांगितले.

‘दी एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया’तर्फे ‘भारतासाठी अवकाश क्षेत्रातील आव्हाने’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन पुण्यात करण्यात आले होते. या परिषदेच्या उद्घाटनावेळी नायडू बोलत होते. यावेळी ‘डीआरडीओ’चे माजी संचालक डॉ. सतीश रेड्डी, ‘इस्रो’चे माजी संचालक डॉ. एस. सोमनाथन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

नायडू म्हणाले, “अमेरिका, युरोप हे देश हवाई क्षेत्रात खूप पुढे आहेत. भारतही आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विकास करत आहे. विमानासाठी लागणारी अनेक उपकरणे आता भारतातच तयार होत आहेत. पुढील पाच वर्षांत उत्पादन क्षमता वाढवून भारत या क्षेत्रात आत्मनिर्भर होईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 2026 पर्यंत ‘एअर टॅक्सी’ची चाचणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.”

50 विमानतळे विकसित करणार:

प्रादेशिक हवाई उड्डाण सुरू करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. पुढील पाच वर्षांत देशात 50 नवीन विमानतळे उभारण्यात येणार आहेत. 2047 पर्यंत ही संख्या 200 च्या पुढे जाईल. सध्या उत्तर प्रदेशातील नोएडा आणि नवी मुंबई येथील विमानतळांचे काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच येथून विमानांचे उड्डाण सुरू होईल, असेही नायडू यांनी सांगितले.

ड्रोन उत्पादनाला प्रोत्साहन:

भारताकडे ड्रोन बनवण्याची क्षमता आहे. सध्या देशात 30 हजार ड्रोन आहेत. 2047 पर्यंत ही संख्या 3 लाखांपर्यंत जाईल. त्यामुळे ड्रोन उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यासाठी आवश्यक उपकरणे आयात करण्यासाठी शुल्क कमी केले जाईल, असे नायडू यांनी सांगितले.

भारताची ‘उंच’ भरारी:

अमेरिकेसह अनेक पाश्चात्त्य देशांच्या तुलनेत भारताने हवाई क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. 2047 पर्यंत भारत जगात आपली वेगळी ओळख निर्माण करेल, असा विश्वास नायडू यांनी व्यक्त केला.

Leave a Comment