भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० मालिका नुकतीच पार पडली, ज्यामध्ये टीम इंडियाने इंग्लंडला ४-१ ने मात दिली. आता दोन्ही संघ ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये आमनेसामने येणार आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया या मालिकेत इंग्लंडला टक्कर देण्यासाठी सज्ज झाली आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील पराभवानंतर रोहित शर्मा पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळणार आहे, त्यामुळे त्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल.
टी-२० आणि एकदिवसीय संघात काही मोठे बदल झाले आहेत. टी20 मालिकेत खेळलेले संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, शिवम दुबे, रमणदीप सिंग, रिंकू सिंग आणि ध्रुव जुरेल हे १० खेळाडू एकदिवसीय संघात नाहीत. तर रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, रवींद्र जडेजा, ऋषभ पंत आणि केएल राहुल यांचे संघात पुनरागमन झाले आहे. हे खेळाडू शेवटचे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये खेळले होते. या मालिकेसाठी संघात परतलेला कुलदीप यादव देखील महत्वाचा खेळाडू ठरू शकतो. श्रेयस अय्यरच्या फिटनेसवर देखील सर्वांचे लक्ष असेल, कारण तो दुखापतीनंतर बऱ्याच दिवसांनी संघात परतला आहे.

IND vs ENG ODI पहिला सामना कधी आणि कुठे?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना ६ फेब्रुवारी रोजी नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जाईल. सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता सुरू होईल. नागपूरची खेळपट्टी फलंदाजीसाठी आणि फिरकी गोलंदाजीसाठी उपयुक्त मानली जाते, त्यामुळे दोन्ही संघांना या मैदानावर चांगली कामगिरी करता येईल.
संघ:
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, कुलदीप यादव, हर्षित राणा, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा
इंग्लंड: हॅरी ब्रुक, बेन डकेट, जो रूट, जेकब बेथेल, लियाम लिव्हिंगस्टोन, ब्रायडन कार्स, जेमी ओव्हरटन, जोस बटलर (कर्णधार), जेमी स्मिथ, फिलिप साल्ट, जोफ्रा आर्चर, गस अॅटकिन्सन, आदिल रशीद, साकिब महमूद, मार्क वुड
या मालिकेमध्ये दोन्ही संघ तुल्यबळ दिसत आहेत, त्यामुळे प्रेक्षकांना एक रोमांचक मालिका पाहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे. इंग्लंडचा संघ देखील मजबूत आहे आणि भारतीय संघाला त्यांच्याकडून कडवी झुंज मिळेल, यात शंका नाही. या मालिकेतील युवा खेळाडूंच्या कामगिरीवर देखील निवड समितीची नजर असेल, कारण याच कामगिरीच्या आधारावर आगामी मोठ्या स्पर्धांसाठी खेळाडूंची निवड केली जाऊ शकते.